गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०११

'मराठी रंगभूमीच्या तीस रात्री' : रात्र ९

 
लेखक : मकरंद साठे
प्रकाशक : पॉप्युलर

१. अनेक वेगळे सामाजिक-राजकीय प्रवाह निर्माण करणारे
नाटककार : भा. वि. ऊर्फ मामा वरेरकर - कुंजविहारी ३६३
२. भा. वि. उर्फ मामा वरेरकर : हाच मुलाचा बाप,
... संन्याशाचा संसार, सत्तेचे गुलाम, तुरुंगाच्या दारात ३७०

***
ही आजची नववी रात्र पूर्ण वरेरकरांनाच वाहिलेली.
१९३० नंतर जेव्हा मराठी रंगभूमी हळूहळू मृतप्राय झाली, व जी होती ती केवळ रंजनपर होऊ घातली, त्या काळातही ज्यांनी गंभीर विषयांची, सामाजिक-राजकीय जाणिवेतून मांडणी चालू ठेवली अशा अपवादात्मक लेखकांपैकी कदाचित सर्वांत महत्त्वाचे म्हणजे भा. वि. वरेरकर.

आपल्यासाठी ते अजून एका कारणानी महत्त्वाचे. ते म्हणजे, गडकर्‍यांनी जीवनदृष्टी अधिक खोलवर नेली असं म्हटलं, तर वरेरकरांनी ती अधिक व्यापक केली असं म्हणता येईल. त्यामुळे नाटकाची व्याप्तीच वाढली. गो. पु. देशपांडे म्हणतात त्याप्रमाणे -‘वरेरकरांची राजकीय, सामाजिक दृष्टी फार स्वच्छ व साफ होती अशातला भाग नाही. काही प्रमाणात मार्क्स आणि काही प्रमाणात गांधी व थोडेसे डांगे अशी त्यांची वैचारिक घडण होती.... (पण) परिणामी आजवर मराठी नाटकाला अपरिचित असलेले अनेक आवाज ऐकू येऊ लागले आणि अनेकविध तणाव दृष्टीस पडू लागले.’

वरेरकरांचं नाटक तोपर्यंत अस्पर्श राहिलेल्या अनेक सामाजिक घटकांना आणि घटितांना भिडलं. नाटकांतून जातीयता, कामगार चळवळ, गांधीवाद, वर्गलढा अशा विषयांचीही मांडणी वरेरकरांनी केली. महाराष्ट्रात जी इतिहासदृष्टी तयार होऊ लागली होती असं आपण म्हटलं त्याचे वरेरकर हे पाईक होते. त्यांनी राजकीय, सामाजिक जाणिवा व्यापक केल्या. केवळ स्वातंत्र्यप्राप्तीचं राजकारण, तत्कालीन राजकीय घटना व डावपेच, वसाहतवादविरोधी, टिळकवादी राष्ट्रीय राजकारण वा सुटेसुटे सामाजिक प्रश्न (उदाहरणार्थ जरठबाला विवाह) या पलीकडे जाऊन, निदान काही प्रमाणात का होईना, काही तत्त्वप्रणालींना भिडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. एकंदरीनेच, स्वातंत्र्य, समता (जशी स्त्रिया आणि दलित यांच्या संबधात) यांचा पुरस्कार केला. आधीच्या अनेक प्रवाहांना त्यांनी वेगळं वळण दिलं, आणि नवे प्रवाहही चालू केले. कामगार, दलित असे तोवर मराठी नाटकाला पूर्णपणे अपरिचित असलेले आवाज त्यामुळे प्रथमच ऐकू येऊ लागले.

***

‘कुंजविहारी’ हे वरेरकरांचं पहिले नाटक-१९०६ सालचं. ते राधाकृष्णामधल्या प्रेमाबद्दलच्या पुराणकथेवर आधारित आहे. त्यात तसं कुठलं रूपकही अभिप्रेत नाही. मग आपण त्याची नोंद का घ्यावी? एखाद्या पुराणकथेकडे कशापद्धतीनं पाहिलं जातं - अगदी पुराणकथा म्हणूनच मांडत असता, म्हणजे ती समकालीन राजकीय रूपक वगैरे म्हणून मांडत नसता - याच्याशीसुद्धा राजकीयता कशी संबद्ध असते त्याचं हे उत्तम उदाहरण आहे, म्हणून आपल्यासाठी महत्त्वाचं.

राधाकृष्णाच्या पुराणकथेची अनेकांनी मांडणी केली आहे. मराठीत मध्ययुगातल्या ज्ञानेश्वरांपासून ते नामदेव, एकनाथांच्या ‘राधाविलास’ सारख्या मधुराभक्तीच्या प्रेरणेनं भरलेल्या काव्यापर्यंत उदाहरणं आहेत. परंतु एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून त्यात फरक पडला आणि दोन पद्धती स्पष्टपणे उद्भवल्या. पहिलीत राधाकृष्ण कथेतील शृंगार-चेष्टांवरच पूर्ण भर होता. पंडित कवींचं काव्य, उदाहरणार्थ वामनपंडितांचे ‘राजभुजंग’ आणि अनेक लावणीकार शाहीर या पठडीतले होते. अशाच धर्तीवर एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अनेक पौराणिक नाटकं लिहिली गेली. हळूहळू हा शृंगार अधिकाधिक उत्तान व केवळ मनोरंजनपर उरला. अर्थात जनमानसातल्या कृष्णाच्या ईश्वरपणाला, त्यातून कुठलाच धक्का बसला नव्हता वा जनमानसात ते कलंकितही झालं नव्हतं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा